अपघातमुक्त चालकांना रौप्य पदक प्रदान
बेळगाव : जनतेने खाजगी वाहनांपेक्षा शासकीय वाहनांचा वापर अधिक करावा. खाजगी वाहनांपेक्षा सरकारी वाहने अधिक सुरक्षित आणि अपघातमुक्त आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा आणि जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी केले आहे. आज बुधवारी बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकावर उत्तर पश्चिम कर्नाटक परिवहन महामंडळ, बेळगाव विभागाच्या अपघातमुक्त चालकांना रौप्य पदक प्रदान केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, खासगी वाहनांमध्ये उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिसत नाही. खासगी वाहनांचे अपघात प्रमाण वाढत आहेत. याकडे लक्ष देऊन, सुरक्षिततेच्या दृष्टीने जनतेने सरकारी वाहनांचा वापर करावा. सरकारी वाहनांमध्ये उत्तम सुरक्षित व्यवस्था आहे.
रौप्य आणि सुवर्ण पदक मिळविणाऱ्या चालकांचे आणि इंधन बचत करणाऱ्या चालकांचे अभिनंदन ज्यांनी चांगली सेवा केली आहे, रौप्य आणि सुवर्ण पदक हा एक उत्तम उपक्रम आहे. परिवहन महामंडळा समोर आर्थिक समस्या आहेत. अशावेळी चालक आणि वाहकांनी जबाबदारी व कर्तव्य समजून आर्थिक तोट्यातून बाहेर कसे पडता येईल याचा विचार करावा, असे कारजोळ यांनी सांगितले.
वायव्य विभागीय अधीक्षक पी. वाय. नायक यांच्या हस्ते 125 चालकांना रौप्य पदक प्रदान करण्यात आले. अनिला एस. कृष्णन, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, अप्पर जिल्हाधिकारी, अशोक दुडागुंटी, कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाचे अध्यक्ष महेश कुमठळी, डब्लू. एस. पाटील, उपाध्यक्ष डॉ. बसवराज यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.