सोलापूर : सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल सहा वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सांगोला-मिरज मार्गावर जुनोनी गावाजवळ हा अपघात झाला आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना टेम्पोची जोराची धडक बसली आहे. वाहनांच्या धडकेत सहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
खरंतर सर्व वारकरी हे कार्तिक वारीसाठी पंढरपूरला निघाले होते. त्यांची दिंडी रस्त्याच्या एका कडेने ज्ञानोबा-माऊलीचा जप करत पुढे सरकत होती.
या दरम्यान रस्त्याने जाणारा एका टेम्पो थेट दिंडीत घुसला. या टेम्पोने अनेक वारकऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.