शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त : उघड्यावर सभा घेण्यास मज्जाव
निपाणी (वार्ता) : सीमाभागातील मराठी बांधवावर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या सीमावासीयांना पाठींबा व मराठी बांधवावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून बुधवारी (ता.१) सीमाभागातील मराठी बांधवांनी बंद पाळला. या बंदला निपाणी शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. मराठी बांधवांनी आपले दैनदिन व्यवसाय बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला.
१ नोव्हेंबर सीमावासीय काळा दिवस म्हणून बंद पाळतात. पण गेल्या चार, पाच वर्षापासून कर्नाटक प्रशासन बंद आणि काळा दिन साजरा करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करीत आहे. काळा दिन पाळणे, बंद पाळणे यावर पोलीस बळाचा वापर करीत आहेत. मात्र सीमाभागातील मराठी बांधव गेली अनेक वर्ष या दबावाला कधीच बळी पडलेले नाहीत. बंदला परवानगी नसली तरी महाराष्ट्र एकीकरण समीती आणि शिवसेनेच्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठी बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून काळा दिन पाळला.
सकाळी ९ वाजल्यापासून अनेकांनी दुकानें बंद ठेवली होती. साखरबाडी, अशोकनगर, बेळगांव नाका परिसरात मराठी बांधवांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली होती. बंदच्या पार्श्वभुमीवर निपाणी शहरासह, राखीव पोलीस दलाच्या पथकासह चोख बंदोबस्त ठेवला होता. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलिसांनी निपाणी शहरातील प्रमुख रस्त्यावरून पथसंचलन केले होते. शिवाय व्यवसायिकांना ध्वनिक्षेपकावरून आपापले व्यवहार चालू ठेवण्याचे आवाहन केले होते. तरीही मराठी भाषिकांनी त्यांच्या आवाहानाला प्रतिसादने देता दिवसभर आपली दुकाने बंद ठेवून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा प्रकट केली.
————————————————-
चौका चौकात पोलीस बंदोबस्त
शहरातील साखरवाडी, बेळगाव नाका, चित्तूर चन्नमा चौक, कोठीवाले कॉर्नर, नरवीर तानाजी चौक सह शहरातील विविध चौकात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. शिवाय उघड्यावर सभा घेण्यास मनाई केली होती. त्यामुळे मराठी भाषेतून संताप व्यक्त केला गेला.