सनतकुमार आरवाडे; पार्श्वनाथ ब्रह्मचार्याश्रमाचा वार्षिकोत्सव
निपाणी (वार्ता) : गुरुकुल शिक्षण संस्थेतून लौकिक आणि नैतिक शिक्षण दिले जात आहे. सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम सुरू असून चुकीच्या व्यवस्थापनाने प्रगती खुंटते. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये अमुलाग्र बदल होत असून त्यानुसार आपणही बदलले पाहिजे. जीवनात येणाऱ्या अडचणी वर मात करण्यासाठी प्रत्येकाने वेळेचे नियोजन करावे. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. त्यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मत बाहुबली ब्रह्मचर्याश्रमचे अध्यक्ष सनतकुमार आरवाडे यांनी व्यक्त केले.
स्तवनिधी येथील श्री १००८ भगवान पार्श्वनाथ महामूर्तीचा चरणाभिषेक विधान, विषारी अमावस्या आणि गुरुकुल संस्थेच्या वार्षिक उत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रमचे उपाध्यक्ष जिनरत्न रोटे होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर दहावी परीक्षेतील गुणी विद्यार्थी, मान्यवर व विविध क्रीडा प्रकारात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. जिनरत्न रोटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास डॉ. ए. एस. चौगुले, राजू पाटील-अक्कोळ, अलका जोशी, तात्यासाहेब आत्मे, बाहुबली नसलापुरे, प्रदीप चौगुले, गोमटेश बेडगे, महावीर पाटील, अभियंते बी. बी. बेडकिहाळे, सुनील बल्लोळ, दादासाहेब पाटील, प्रदीप पाटील, ज्योतिबा पाटील, एम. बी. कोल्हापुरे यांच्यासह पालक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. जे. डी. कोरडे, पूजा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळे यांनी आभार मानले.