बेळगाव : बेळगाव शहरात वाढत्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी बिम्स रुग्णालयात जाऊन डेंग्यूग्रस्त रुग्णाची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचप्रमाणे डॉक्टरांकडून रुग्णांबद्दल माहिती घेतली. दररोज किती तापाचे रुग्ण येतात, त्यांना तुम्ही औषध कसे देत आहात, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी बिम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांची बैठक घेऊन बिम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडून डेंग्यूच्या रुग्णांची माहिती घेतली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, बेळगावमध्ये डेंग्यूची भीती आहे. ग्रामीण भागासह महाराष्ट्र, गोव्यातून रुग्ण येत आहेत, त्यामुळे संख्या वाढत होत आहे. जेव्हा पाऊस पडतो आणि पाणी साचते तेव्हा डासांची उत्पत्ती होते, त्यामुळे डास घरात येऊ नयेत म्हणून संध्याकाळी खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. क्रीम लावा. महानगर पालिकेकडून फॉगिंग करण्यात येत आहे. सर्व डास एकाच वेळी मरत नाहीत. आधी आजूबाजूला पाणी साचणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी काल घेतलेली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत सीईओंची बैठक हा पुरावा आहे की, राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अजूनही कोलमडलेली आहे, राज्यात मेडिकल आणीबाणी जाहीर करण्याची गरज नाही असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव म्हणतात मात्र राज्यात सर्वाधिक पाऊस पडत असल्याने डेंग्यूची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे वैद्यकीय आणीबाणी जाहीर करणे आवशयक आहे.
सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, गीता सुतार, मुरुगेंद्र गौडा पाटील, अशोक शेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोणी आदींसह अनेकांची उपस्थिती होती.