नेपाळमध्ये पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. अशामध्ये भूस्खलनानंतर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दोन बस नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास नेपाळमधील नारायणघाट- मुंगलिंग मार्गावरील मदन-आशीर हैफा येथे भूस्खलन झाले. या भूस्खलनानंतर दोन प्रवासी बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. जवळपास ६० प्रवासी वाहून गेले आहेत. घटनास्थळावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नदीमध्ये वाहून गेलेली एक बस बीरगंजहून काठमांडूला जात होती. तर दुसरी बस गौरहून काठमांडूला जात होती. नारायणघाट-मुगलिंग मार्गावर भूस्खलन झाले. या दोन्ही बसमधून चालकांसह ६३ जण प्रवास करत होते. भूस्खलनानंतर दोन्ही बस त्रिशूली नदीमध्ये वाहून गेल्या. या घटनेत अनेकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या भूस्खलनानंतर महामार्गावर आलेली माती आणि दगड हटवण्याचे काम सुरू आहे. दोन्ही बसचा शोध घेतला जात आहे. पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. ही घटना घडताना तीन जणांनी बसमधून उडी मारली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. तर इतर सर्व प्रवासी बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.
जिल्हा दंडाधिकारी इंद्रदेव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये झालेल्या भूस्खलनात एंजल आणि गणपती डिलक्स कंपनीच्या बस वाहून गेल्या आहेत. या दोन्ही बस नेपाळमधील काठमांडू येथून रौतहाटच्या दिशेने जात होत्या. एका बसमध्ये २४ जण प्रवास करत होते. तर दुसऱ्या बसमध्ये ४१ जण प्रवास करत होते. या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा लवकरात लवकर शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत.