बंगळूर : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती विश्वजित शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने आरोपी नवीन कुमार, अमित आणि एच. एल. सुरेश यांना जामीन मंजूर केला.
या प्रकरणातील पाचवा आरोपी अमित दिगवेकर ऊर्फ अमित ऊर्फ प्रदीप महाजन; सातवा आरोपी सुरेश एच. एल. उर्फ शिक्षक आणि १७ वा आरोपी के. टी. नवीन कुमार उर्फ नवीन यांनी दाखल केलेला जामीन अर्ज गुलबर्गा खंडपीठातील न्यायमूर्ती एस. विश्वजित शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील एकल सदस्यीय खंडपीठाने मंजूर केला.
जामीन मंजूर करताना न्यायालयाने अनेक अटी घातल्या असून, या अटी पूर्ण झाल्यानंतर आज सायंकाळी किंवा उद्या आरोपींची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.
अकरावा आरोपी मोहन नाईक यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, हे पाहता त्यांनाही जामीन द्यावा, असा युक्तिवाद सर्व याचिकाकर्त्यांनी केला. त्यावर सरकारी वकिलांनी जोरदार आक्षेप घेत, “हत्या, कट रचणे असे गंभीर आरोप असताना जामीन देता येणार नाही, असे सांगून मोहन नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने फेटाळला.
या संपूर्ण प्रकरणात जामीन मिळवणारे मोहन नाईक हे एकमेव आणि पहिले आरोपी आहेत, ज्यांच्या जामीन आदेशाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, ज्याची सुनावणी प्रलंबित आहे.”
पहिला आरोपी अमोल काळे याच्या जबाबाच्या आधारे अमितला अटक करण्यात आली. अमितवर या कृत्याला आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. नवीन कुमारने पार्कमध्ये १३ व्या आरोपी सुजित (सुजितने समन्वयकाची भूमिका निभावली) याच्याशी बोलून कट रचल्याचा आरोप आहे. १५ वा आरोपी विकास पाटील याला गौरी लंकेश यांच्या घराचा पत्ता शोधण्यात आणि शस्त्रे लपवण्यासाठी मदत केल्याचा सुरेशवर आरोप आहे.
५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी लंकेश यांची कामावरुन घरी परतत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अमोल काळे याच्यावर खुनाचा कट रचणारा मुख्य सूत्रधार म्हणून खुनाचा आरोप आहे, तर परशुराम वाघमोरे याच्यावर गोळीबार केल्याचा आणि गणेश मिस्कीनवर दुचाकीवरून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे.