वायनाड : केरळच्या वाडनाड येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसाने भूस्खलन झाल्याने ४ गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. अजूनही २०० पेक्षा अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
बचावकार्य सुरूच
आपत्तीग्रस्त भागांत शोधमोहिम आणि बचावकार्याचे काम युद्धपातळीवर सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप अनेकजण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सतत येणाऱ्या पावसामुळे बचावपथकाला मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत. रात्री उशिरापर्यंत रेक्यू ऑपरेशन सुरू होते. अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बचावकार्यात लष्कर, नौदल, एनडीआरएफ, राज्याचे आपत्ती निवारण दल, पोलिस, अग्निशमन दलाचे जवान सहभागी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेपाडी भागात भूस्खलन झाले असून याचा फटका मुंडक्की, चूरामाला आणि नूलपुळ्ळा या गावांनाही देखील बसला. त्यामुळे शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आतापर्यंत अनेकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे.