निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेळगांव येथील सरकारी क्रिडांगणावर रयत संघटनेतर्फे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनी गुरुवारी (ता.१५) उपोषण करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारने न्याय दिलेला नाही. शेतकऱ्यांना आज पर्यंत स्वातंत्र्य मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही. दरवर्षी अतिवृष्टी आणि महापुराच्या वेळी पिकांचे नुकसान होत शासनातर्फे त्याचा सर्वे केला जातो. उन्हाळ्यात लोड शेडिंग केले जात असल्याने पिके वाळून जात आहे. पण शेतकऱ्यांना भरपाई दिली जात नाही. अनेक शेतकरी शासनाच्या विविध योजना पासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. परिणामी अनेक शेतकरी आत्महत्येकडे वळत आहेत.
उपोषणकर्त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजर कैद करुण त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रोशन बेग यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रयत संघटनेने उपोषण स्थगित केले. अश्वासनाप्रमाणे कार्यवाही न केल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा राजू पोवार यांनी दिला. यावेळी प्रकाश नाईक, किसन नंदी, आश्मा एम. यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.