बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या उपयोगाला आणून शेतजमीन बारमाही ओलिताखाली ठेवून हरित क्रांती घडवून आणण्याचा विचार करण्यात यावा यासाठी ‘तिलारी धरण महाराष्ट्र’ कालव्याने नदीला जोडण्यासंबंधीची योजना आखण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सोमवारी बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार जगदीश शेट्टर यांना सादर करण्यात आले.
निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, चंदगडचे आमदार श्री. राजेश पाटील यांच्यासोबत तसेच राज्यस्तरीय उच्चाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विचार विनिमयाने, समन्वयाने हे काम मार्गी लावू.
निवेदन देण्यासाठी पुंडलिक मोरे, पुंडलिक पावशे, निंगाप्पा जाधव, किसन सुंठकर, सुरेश अगसगेकर, माजी नगरसेवक नगरसेवक अनिल पाटील, महांतेश कोळुचे, उमेश नाईक, ग्रामपंचायत सदस्य मारुती सुतार, वैजनाथ बेन्नाळकर, नेताजी बेनके आदी उपस्थित होते.