सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आठ महिन्यात कोसळली. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आता याप्रकरणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीत फायबरची मिलावट केली होती, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच राजकोट किल्ल्यावर जात घटनास्थळाची पाहणी केली. मनोज जरांगे हे काल रात्रीच मालवणमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळली त्या घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोठा दावा केला.
“…त्यात फायबरची मिलावट होती”
छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती होती त्यात फायबरची मिलावट होती, असं इथल्या काही बांधवांचे म्हणणे आहे. पश्चिमेकडून वारं येतं होता, मग पुतळा पूर्वेकडे पडायला हवा होता, तो पश्चिमेकडेच कसा काय पडला, या काही शंका आहेत.
“कोणतेही राजकारण करु नये”
आरोपीला आयुष्यभर जेलमध्ये ठेवायला हवे. सरकारचा अगदी बारीक लक्ष महापुरुषांचे स्मारक किंवा पुतळे यांच्याबद्दल असायला हवे. फक्त यात कोणतेही राजकारण करु नये. कोणी काहीही शंका उपस्थित केल्या, म्हणून त्या ग्राह्य धरुन नकार देण्याऐवजी यात काय खरं आहे, याचा शोध घ्यायला हवा, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
“…नाहीतर जनता तुमचा कार्यक्रम करेल”
“कंत्राटदार पळून जातोच कसा काय? तो आयुष्यभर जेलमध्ये सडायला हवा. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या घटनेचे राजकारण करत आहेत. तुम्ही एकमेकांवर चिखलफेक करता, आरोप करता, हे सर्व महाराष्ट्र बघत आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावर कोणीही राजकारण करु नये. नाहीतर जनता तुमचा कार्यक्रम करेल”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.