
येळ्ळूर : सीमाप्रश्न आणि मराठी जनता हे आपलं सर्वस्व मानून चौफेर पणे जरा सुद्धा उसंत न घेता तो धसास लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या एक कणखर नेत्याला आम्ही पोरके झालो आहोत. दीपक दळवींनी अखेरच्या श्वासापर्यंत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केलेले प्रयत्न आम्ही कदापि वाया जावू देणार नाही आपण सर्वांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकत्र राहून सीमा प्रश्नाची सोडवणूक करणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा भावना येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी एपीएमसी सदस्य वामनराव पाटील हे होते.
प्रारंभी दीपक दळवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर म. ए. समितीचे कै. कृष्णा घाडी, कै. जिजाबाई मोनापा धामणेकर, कै. भावाकाणा गोरल, कै. कृष्णाबाई सुभाष कदम, कै. अशिष अमोल गोरल यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रकाश अष्टेकर यांनी, दळवी साहेबांनी सीमाभागातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना बळकट करून सीमाप्रश्नाला चालना दिली, असे सांगून श्रद्धांजली वाहिली. युवा नेते दत्ता उघाडे यांनी, दीपक दळवी यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेल्या त्यागाला मराठी जनता कधीही विसरणार नाही असे सांगून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले यांनी, दळवी साहेब हा माणसात मिसळून काम करणाऱ्या नेत्याला आम्ही मुकलो आहोत, असे सांगितले. किरण आण्णा पाटील यांनी, त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली वाहिली. माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुद्दापा बागेवाडी यांनी, दळवीसाहेबांचं आणि येळ्ळूरचं अनोखं नातं होतं त्यांच्या जाण्याने सीमाभागाचे मोठे नुकसान झाले आहे, असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात वामनराव पाटील यांनी समस्त येळ्ळूर गावच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या शोकसभेत नवहिंद सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव सायनेकर, ग्रामपंचायत सदस्य दयानंद उघाडे, राकेश परीट, बाळकृष्ण पाटील, प्रकाश मालुचे, सुरज गोरल, कृष्णा शहापूरकर, प्रभाकर मंगणाईक, यलुपा पाटील, भिमराव पुन्याणावर, दौलत पाटील, बाळकृष्ण धामणेकर, अरूण फुटाणी, समीर परीट, नेताजी गोरल, अनंत घाडी, पाटील, नाथाजी कदम, नंदकुमार पाटील, कृष्णा बिजगरकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta