बेळगावमध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा
बेळगाव : आपण ज्या भूमीवर जन्मलो, ज्या भूमीवर सर्व वस्तूंना आधार मिळतो, ती भूमी सर्वांसाठी मोठा आधार आहे. हि भूमी सुरक्षित ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. जमीन हि परमेश्वराची देणगी आहे, असे मत वन्यजीव, पर्यावरण विकास मंचाचे प्रधान सचिव डॉ. डी. एन. मिसाळे यांनी व्यक्त केले.
कणबर्गी येथील ग्रंथालयात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वन्यजीव, पर्यावरण विकास मंच आणि स्नेह समाज सेवा संघ यांच्या स्नायुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर बोलताना डॉ. डी. एन. मिसाळे म्हणाले, पृथ्वी ही सर्व सजीवांची जननी आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे आपण सर्वनाशाकडे वाटचाल करीत आहोत. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी हि प्रत्येकाची आहे. जमिनीचे ऋण जपणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. आपल्या पिढीला मिळालेला वारसा पुढील पिढीला सुरक्षितपणे सोपविण्याची आपण याचे जतन करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक हनुमंत कोंगाली बोलताना म्हणाले, प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. हा प्रकार थांबविणे गरजेचे असून पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.
समाजसेवक, यादव फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश यादव बोलताना म्हणाले, सरकार सर्व काही हाताळू शकत नाही. आपणदेखील नागरिक या नात्याने आपली जबाबदारी पार पडणे आवश्यक आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, कचरा इतरत्र न फेकता कचरा कुंडीतच फेकणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, शिस्त पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे यादव म्हणाले.
यावेळी एस. सी. कमीत, डी. एम. टोन्ने, बसवराज गोडप्पगोळ, राजेंद्र रतन, मनोहर काजूगर, एस. एम. मेलिनमानी, जी. आय. दळवाई, सुब्बापूरमठ, डी. बी. उळ्ळेगड्डी, एन. बी. हांनिकेरी, एस. एल. सनदी, जी. एस. हिरेमठ, अनंत हन्नीकेरी यासह पर्यावरण प्रेमी आणि मान्यवर उपस्थित होते.