बेळगाव : भारत हा देश खेड्यांचा देश आहे, देशातील खेड्यांचा विकास व्हायला हवा. तेथील गृहोद्योग वाढले पाहिजेत, ग्रामीण भागात राहणाऱ्या कारागिर आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे हे महात्मा गांधींचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत, असे जलसंसाधनमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.
बेळगाव येथील काँग्रेस विहीर, वीरसौधच्या प्रांगणात गुरुवारी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एकेएएम अंत्योदय कार्यक्रमाचे जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगर पालिका, कन्नड आणि सांस्कृतिक खात्याच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. मंत्री गोविंद कारजोळ यांनी दीपप्रज्वलनाने त्याचे उद्घाटन केले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
आता देश १०० वर्षांचा होईल तेंव्हा कसा असेल हे आम्हा सगळ्यांच्याच हातात आहे. महात्मा गांधी यांचे, ग्रामीण विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांनी अनेक कल्याणकारी योजना आखल्या आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटकात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई नेतृत्वाखालील सरकारही अनेक नव्या योजना जारी करून लोककल्याणाचे काम करीत आहे. खासकरून शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्याची महत्वाकांक्षी योजना आणली आहे असे कारजोळ म्हणाले.
यानंतर बोलताना दक्षिणचे आ. अभय पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ७ ते ८ लाख लोकांनी बलिदान दिले. त्यात युवकांची संख्या मोठी आहे. मात्र त्यांचा इतिहासात उल्लेख नाही. अनंत कणेरीया, खुदिराम बोस, चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, सुखदेव अशा अनेक थोर स्वातंत्र्यवीरांची माहिती आजच्या पिढीला देण्याची गरज आहे.
कार्यक्रमात विविध १२ खात्यांच्या लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, जि.पं. सीईओ दर्शन एच. व्ही., मनपा आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी, कन्नड व संस्कृती खात्याच्या सहायक संचालिका विद्यावती बजंत्री यांच्यासह अनेक अधिकारी, लाभार्थी उपस्थित होते.