बेळगाव : बेळगावमधील तिरंगा कॉलनी येथील नाल्यात पाणी वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी वाहात आहे. यामुळे येथील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. बेळगावमधील तिरंगा कॉलनी शेजारी असलेल्या नाल्यात पावसामुळे पाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या नाल्यातील पाणी रस्त्यावर ओसंडून वाहात आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून आजूबाजूच्या भागातील पाणीही या नाल्यात येत असल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास होत आहे. नाल्याबाहेर पाणी वाहून आल्याने रस्ता खचत आहे. या मार्गावरील विजेचे खांबही चांगले नाहीत. त्यामुळे हि समस्या तातडीने सोडविण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवाशी करत आहेत.
यावेळी येथील स्थानिक रहिवाशांनी या समस्येसंदर्भात बोलताना सांगितले, नाल्यातून पाणी ओसंडून वाहून रस्त्यांवर येत आहे. बिजापूर कॉलनी, उज्वल नगर, तिरंगा कॉलनी, मिलन कॉलनी आदी भागात हे पाणी शिरत असून रस्त्यावरून वाहणाऱ्या नाल्याच्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या पाण्यामुळे रस्ताही खचत चालला असून यासंदर्भात अधिकाऱ्यांनाही अनेकवेळा सूचना देण्यात आल्या आहेत मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून तातडीने हि समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या भागातील नगरसेवक अफजल पठाण यांनी बोलताना सांगितले कि, नाला दुरुस्तीसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या भागाचे आमदार या भागातील कोणतीही समस्या सोडविण्यासाठी तत्परता दाखवत नाहीत. जनता आपल्याला प्रश्न विचारते. मात्र आमदार आणि अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे ते म्हणाले. या भागात उद्भवलेली समस्या तातडीने दूर करून जनतेची सोय करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.