बेळगाव : खानापूरसह बेळगांव तालुक्यातील हजारो विद्यार्थी बेळगांव शहरात शिक्षणासाठी ये-जा करत असतात. मात्र अपुर्या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. लांब पल्ल्याच्या बस आधीच क्षमतेपेक्षा जास्त भरून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये जागाच मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना बसच्या दाराजवळ लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांचे होणारे त्रास लक्षात घेता खानापूर बेळगाव परिसरात अतिरिक्त बस चालू करण्याची आवश्यकता आहे. याबाबत वारंवार मागणी करून देखील परिवहन मंडळ विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करत असताना अनेकदा विद्यार्थ्यांना लहानमोठ्या दुखापती झालेल्या आहेत. आता एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच परिवहन मंडळाला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल विद्यार्थी करत आहेत.
बेळगांव, खानापूर तालुक्यातून शिक्षणासाठी शहराकडे येणार्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या पाहता सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात वेळेत आणि अतिरिक्त बस चालू करणे गरजेचे आहे. विद्यार्थी वर्गाला शाळा, महाविद्यालयात वेळेत पोहचताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कधीकधी विद्यार्थी खाजगी वाहने किंवा वडापने ये-जा करत असतात, त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर बर्याचदा ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांना बसमध्ये लटकत किंवा एक पायावर उभे राहून प्रवास करावा लागत आहे. वारंवार मागणी करून देखील परिवहन मंडळ अतिरिक्त बस सेवा पुरविण्यास अपयशी ठरले आहे. याबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीने सातत्याने परिवहन मंडळाला निवेदन दिले आहे. मात्र परिवहन मंडळ पोकळ आश्वासन देण्यापालिकडे काहीच करताना दिसत नाही.
Belgaum Varta Belgaum Varta