बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीमध्ये 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त देशभरात गेले तीन दिवस ध्वजारोहण तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येळ्ळूर येथे येळ्ळूर ग्राम पंचायतीकडूनही 13-14-15 रोजी ‘हर घर तिरंगा अभियाना’ अंतर्गत ध्वजारोहण करण्यात आले होते. आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यासाठी येळ्ळूर ग्रा. पं. अतिशय सुंदररित्या सजवलेली होती. सर्व प्रथम येळ्ळूर ग्रा. पं. उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर आणि ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन झाले. त्यानंतर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश बा. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताने ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर गांधीवादी विचारांचे शिवाजीराव कागणिकर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ग्रा. पं. अध्यक्ष सतीश बा. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शिवाजी कागणिकर म्हणाले, आपला देश स्वतंत्र झाला खरा पण वैचारिक व शैक्षणिक दृष्टीने अजूनही तो स्वतंत्र झालेला नाही, “आपण स्वराज्य निर्माण केले, आता आपल्याला सुराज्य निर्माण करायचे आहे. असेही ते म्हणाले. तसेच नरेगा विषयी माहिती देताना त्यांनी त्याचे महत्वही समजावून सांगितले. तसेच रोजगार हमी योजनेची माहिती देत ते म्हणाले की, देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. यानंतर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी आपले विचार मांडले.
यावेळी बोलताना सतीश पाटील म्हणाले, आपला देश आता प्रगतीच्या पथावर आहे आणि ग्रा. पंचायतीचा त्यामध्ये सहभाग आहे. त्यामूळे ग्रा. पंचायतीच्या माध्यमातुन रोजगार हमी योजनेच्या अंमबजावणीनुसार जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असू, असेही ते म्हणाले. ग्रा. पं सदस्य प्रमोद पाटील तसेच प्रमोद सूर्यवंशी यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रतीक सतीश पाटील व विघ्नेश सतीश पाटील या बालचमूनीही आपली छोटी छोटी भाषणे सादर केली. आणि त्यानंतर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश बा. पाटील अध्यक्षीय भाषण केले. यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, ग्रा. पं. सदस्य, सदस्या, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका, बालचमु, तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार ग्रा. पं. सेक्रेटरी सदानंद मराठे यांनी मानले.
Check Also
प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार
Spread the love बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …