अथणी : येथे क्रांतीवर संगोळ्ळी रायण्णा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. युवानेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. तत्पूर्वी निघालेल्या भव्य मिरवणुकीत त्यांनी सहभाग घेत युवकांना मार्गदर्शन केले.
श्रीनिवास पाटील म्हणाले, कित्तूर राणी चन्नम्मा यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. अशा क्रांतीवीरांमुळेच आज आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत आणि याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या कर्तत्वातून बोध घेऊन आपली वाटचाल सुरू राहिली पाहिजे. स्वातंत्र्यदिनी क्रांतीवीरांचा जन्म झाला असून आज त्यांचा जन्मदिन व देश अमृत महोत्सव साजरा करत आहे, हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.
यानंतर निघालेल्या मिरवणुकीत त्यांनी सहभाग घेतला. क्रांतीवीरांची प्रतिमा असलेला ध्वज हाती घेऊन ते मिरवणुकीत सहभागी होताच अनेकांनी त्यांना उचलून घेत जयजयकार केला. गावातील विविध रस्त्यांवरून मिरवणूक निघून व्यासपीठाजवळ सांगता झाली. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते क्रांतीवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उगार खुर्द नगरपालिकेचे सदस्य, क्रांतीवीरांचे अभिमानी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.