बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे येत्या रविवारी होणाऱ्या श्रीक्षेत्र कुऱ्हे पानाचे येथील भव्य हरिपाठ मंदिराच्या भूमिदान संकल्प सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आलेले श्री रामनाथगिरी समाधी मठ संस्थान कसबा नूलचे (ता. गडहिंग्लज) श्री राष्ट्रीय धर्माचार्य प. पू. स्वामी भगवानगिरी महाराज यांनी आज शुक्रवारी शहराचे श्रद्धास्थान असलेल्या जत्ती मठाला सदिच्छा भेट दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे येत्या रविवार दि. 26 मार्च रोजी दुपारी 3 वाजता श्रीक्षेत्र कुऱ्हे पानाचे (ता. भुसावळ, जि. जळगाव) येथील भव्य हरिपाठ मंदिराचा भूमिदान संकल्प सोहळा होणार आहे. बेळगाव येथील स्वराज्यातील सरदार घराण्याचे वंशज श्रीमंत रमेश आणि दिलीप केशवराव रायजादे समशेर बहाद्दर हरवलीकर सरकार यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी कसबा नुलचे श्री राष्ट्रीय धर्माचार्य प. पू. स्वामी भगवानगिरी महाराज यांचे आज शुक्रवारी सकाळी आळंदी देवाचीचे श्री मुक्ताई सेवक हभप प्रा. कृष्णा महाराज परेराव यांच्या समवेत बेळगाव आगमन झाले होते. श्रीमंत रमेश व दिलीप रायजादे हरवलीकर सरकार यांना यांना भेटून निमंत्रण दिल्यानंतर स्वामी भगवानगिरी महाराजांनी शहरातील जत्तीमठ आणि जुने बेळगाव येथील श्री कलमेश्वर देवस्थानाला सदिच्छा भेट देऊन देवदर्शन घेतले.
जत्तीमठ येथे साहित्यिक गुणवंत पाटील यांनी जत्तीमठ आणि बेळगावकरांच्यावतीने स्वामी भगवानगिरी महाराज आणि हभप प्रा. कृष्णा महाराज परेराव स्वागत केले त्यानंतर जत्तीमठाचे विश्वस्त दत्ता जाधव यांनी त्या उभयतांचा शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन जत्ती मठातर्फे सत्कार केला. यावेळी आपल्या प्रास्ताविकात गुणवंत पाटील म्हणाले की, आपली जी श्रद्धा असताना असतात ती बळकट करण्यासाठी अनेक लोक प्रयत्नशील असतात. यासाठी काहीजण आपली हयात खर्ची घालतात. त्यांच्या कार्याला सहकार्य करणे बळ देणे हे समाजाचे कर्तव्य असते. या कर्तव्य भावनेतून या दोन्ही मान्यवरांचा आपण सत्कार करत आहोत. तसेच त्यांनी हाती घेतलेल्या कामाला बळकटी देण्यासाठी तन-मन-धनाने आपण त्यांच्याशी संलग्न व्हायचे आहे.
आपल्याकडे येणाऱ्या परगावच्या पाहुण्यांची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. मनुष्याला मनुष्याप्रमाणे वागण्याची शिकवण संत मंडळी देत असतात. तेंव्हा संतांच्या कार्याला पाठबळ देण्याचे काम समाजाने करायला हवे. आजची तरुण पिढी चांगल्या विचारांपासून भरकटत चालली आहे. ती आपल्या संस्कृती पासून दूर जात आहे असे बोलले जाते. त्यासाठी काय करायला हवे? याचा विचार झाला पाहिजे. आपण आपली संस्कृती टिकवण्यासाठी आणि तरुण पिढीला संस्कृतीशी निगडित ठेवण्यासाठी अशा संत मंडळींच्या सानिध्यात नव्या पिढीला नेणे गरजेचे आहे.
तरच आपली भावी पिढी चांगल्या दिशेने घडत जाईल असेही गुणवंत पाटील यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी श्रीमंत रमेश रायजादे हरवलीकर सरकार, बेळगाव वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप शंकर बाबले महाराज, सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, माजी नगरसेवक अनिल पाटील, श्री कलमेश्वर देवस्थान ट्रस्ट जुनी बेळगावचे विश्वस्त नारायण खन्नूकर, प्रकाश बिळगोजी, महादेव पवार आदी उपस्थित होते.