बेळगाव : बेळगाव शहराच्या दक्षिण भागात आत्महत्या केलेल्या विणकर कामगारांची सतीश जारकीहोळी यांनी भेट घेत सांत्वन केले. मागील आठवड्यात कर्जाच्या जाचाला कंटाळून वडगाव भागातील पांडू उपरी, गणपती बुचडी या दोन विणकरांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविले होते. या पार्श्वभूमीवर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी त्यांच्या कुटुंबियांची रविवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी बोलताना मृत विणकरांच्या पत्नीनी स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक आमच्याकडे लक्ष देत नाहीत असे सांगून आजवर कसलीच मदत मिळाली नसल्याचे सांगत त्यांना अश्रू अनावर झाले.
कोरोना आणि पावसामुळे आमची स्थिती बिकट झाली. कर्ज फेडणे अशक्य झाले. त्यामुळे कुटुंबाच्या कर्त्यांनी आत्महत्या केली. कोरोना संकटात तर 3 महिने अन्नपाण्याविना उपाशी राहण्याची वेळ आली तरीही स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा अन्य कोणी मदत केली नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली. यावर सतीश जारकीहोळी यांनी पीडित कुटुंबांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2021/11/satish-660x330.jpg)