खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून शरद पवार यांना साकडे

बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई व माजी आमदार दिगंबर पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी कृषी मंत्री तसेच माजी संरक्षण मंत्री श्री. शरद पवार यांची भेट घेतली.

यावेळी 2004 पासून सीमाप्रश्न त्यामध्ये प्रलंबित आहे. 2017 पासून आजपर्यंत एकदाही या केसची सुनावणी झालेली नाही. तीन बेंचचे कोर्टमध्ये कर्नाटक किंवा महाराष्ट्राचे न्यायाधीश उपस्थित असतात ही कारण देत आजपर्यंत तारखा पडत आलेल्या आहेत. यापुढील सुनावणी दरम्यान दोन्ही राजांच्या बेंच ऐवजी तिराईत राज्यांचे न्यायाधीश नियुक्त करून ही सुनावणी लवकरात लवकर घ्यावी व कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न त्वरित निकालात काढावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
गेली 66 वर्षे सीमाभागातील जनता कानडीकरणाच्या वरवंट्याखाली भरडली जात आहे. त्याच्यातून मुक्तता करण्यासाठी आपणच सीमाभागाच्या आधारस्तंभ आहात तरी आपण लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून उच्चाधिकार समितीची बैठक बोलावून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे यांच्याकरवी या दाव्याला गती द्यावी अशी विनंती सीमाभागातील महाराष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेबांनी सीमावासीयांना आश्वस्त करत आपण मुंबईला जाऊन तात्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्चाधिकार समितीची त्वरित बैठक घेऊन यावर त्वरित हालचाली करू असे आश्वासन दिले.
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, सहचिटणीस रणजीत पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, रवींद्र शिंदे, सदस्य कृष्णा मल्लाप्पा कुंभार, उपाध्यक्ष श्री. कृष्णा मंडोळकर, बेळगावचे माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर तसेच निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta