
बेळगाव : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा गाजू लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. आता जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबरोबरच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचाही विषय आंदोलनात उपस्थित करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकिकरण समितीने पत्राद्वारे केली आहे.
मराठा आरक्षणासाठी याआधी महाराष्ट्रात 56 विराट मूक मोर्चा निघाले आहेत. त्यापैकी कोल्हापूर बेळगाव आणि शेवटच्या मुंबई येथील मोर्चात सीमा प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणा बाबत महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभे राहत आहे. त्यामध्ये जालना येथील मनोज जरांगे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धार वाढत आहे. याकडे लक्ष देऊन मागील वेळी ज्या प्रकारे मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी मोर्चा काढताना सीमाभागातील मराठी खास माणसांना न्याय द्यावा अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे आताही आंदोलनात सीमावासियांच्या मागणीचा विचार करण्यात यावा. असा विचार समोर आला आहे. त्यानुसार शहर म. ए. समितीने मनोज जरांगे पाटील यांना पत्र पाठवले आहे. या पत्राची कशी दखल घेतली जाणार याबाबत समिती नेते आणि सीमावासीयांत उत्सुकता दिसून येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta