बेळगाव : बेळगाव सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने लढा देत आहे. बेळगाव येथे सुवर्ण विधानसभा बांधण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वर्षी विधिमंडळाचे अधिवेशन बेळगावच्या सुवर्णसौध येथे आयोजित केले जात आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा लढ्याचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे, असा अजब तर्क कर्नाटक विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी आज व्यक्त केला आहे.
डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी बसवराज होरट्टी आज मंगळवारी बेळगावला आले आहेत. येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची माहिती घेतल्यानंतर, पत्रकारांशी बोलताना त्यांनी सुवर्णसौध आणि हिवाळी अधिवेशनामुळे म. ए. समिती आणि सीमा लढ्याचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे वक्तव्य केले आहे. एच डी कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री काळात बेळगावात सुवर्णसौध उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले. बेळगाव येथे सुवर्णसौध बांधण्यात आल्याचा हेतू यशस्वी झाला आहे. बेळगाव सीमाभाग हा कर्नाटकाचाच असल्याचे सिद्ध झाले आहे. असेही होरट्टी म्हणाले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यासंदर्भात केलेले विधान बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी एक कळीचा मुद्दा ठरणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta