बेळगाव : भारतीय नागरिकांनी सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष यासह राज्यघटनेतील सर्व आकांक्षा तरुण पिढीने दैनंदिन जीवनात अंमलात आणल्या तर देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे, असे प्रतिपादन शासनाच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी व्यक्त केले.
कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने सुवर्णसौध सभागृहात आज बुधवारी भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाचा एक भाग म्हणून आयोजित डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या संविधान वाचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्य, देशाच्या ग्रामीण भागात उच्च शिक्षण, बालविवाह आणि कुपोषण अशा मुलींशी भेदभावाचे विविध प्रकार आजही प्रचलित आहेत. हे दूर करण्यासाठी सर्वांनीच परिश्रम घेतले पाहिजे. आजच्या तरुण पिढीला शिक्षणाबरोबरच खेळ, कला, संगीत, साहित्य आदी कौशल्यांमध्येही रस निर्माण करून स्वत:च्या आवडीनिवडी घेऊन समाजासाठी चांगले योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
शालिनी रजनीश यांच्या हस्ते अभ्यास कार्यक्रमासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलपती राजश्री जैनापुरे आणि विविध शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.