बेळगाव : राज्यातील कायदा व सुव्यवस्था भाजपच्या कार्यकाळात ढासळली कि काँग्रेसच्या याची आकडेवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडली आहे, असे स्पष्टीकरण बेळगाव जिल्हा पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.
बेळगावमधील काँग्रेस भवन येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या भाजपच्या आरोपाला मंत्री सतीश जारकीहोळी यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. एक वर्षाच्या कार्यकाळातील काँग्रेसने केलेल्या कामकाजाचा आढावा देत मुख्यमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीची माहिती आकडेवारीच्या माध्यमातून दिल्याचेही सतीश जारकीहोळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आधीच स्पष्ट केले आहे, असे जारकीहोळी म्हणाले. तर यापुढेही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव टाळण्यासाठी येत्या काही दिवसांत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांची थकबाकी भरण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. इस्लामपूर येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणाबाबत पोलीस विभाग संबंधित बेजबाबदार पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पाणीप्रश्नी प्रतिक्रिया देताना त्यांनी, महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून मार्च महिन्यात कृष्णेला पाणी सोडण्याची विनंती केली होती त्यानुसार राजापूर बॅरेजमधून पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती दिली.
यावेळी आमदार आसिफ सेठ, माजी मंत्री वीरकुमार पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते.