बेळगाव : बेळगावच्या अनगोळमधील रघुनाथपेठ रस्ता अनेक दिवसांपासून विकासापासून वंचित आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आज स्थानिकांनी केली.
बेळगावातील अनगोळमधील रघुनाथ रोडची दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक त्रस्त असून, दररोज अपघात होत आहेत. अनेक बलाढ्य आमदार, नगरसेवकांसह संबंधित अधिकाऱ्यांना आवाहन करूनही आज येथील रहिवाशांनी छत्रपती संभाजी महाराज चौकात ‘मी रघुनाथ पेठ, अनगोळ रोड बोलतोय’ असे फलक लावून रस्त्याची दुरावस्था दाखवून आंदोलन केले. रघुनाथ पेठ रस्त्यावर पाइपलाइन टाकल्यानंतर रस्ता विकसित करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले होते. मात्र, आजतागायत या रस्त्याची सुधारणा झालेली नाही. या ठिकाणी दररोज एक ना एक अपघात होत आहे. या रस्त्यावरून वृद्ध व लहान मुले जीव मुठीत धरून चालत असल्याची परिस्थिती आहे. याबाबत महापौर, आमदारांसह संबंधित अधिकाऱ्यांना १०-१५ वेळा विनंती करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. उन्हाळ्यात या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आणि पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. गणेशोत्सवाची पार्श्वभूमीवर बोलावलेल्या बैठकीत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाही अद्यापपर्यंत रस्त्याची सुधारणा न करण्याच्या महापालिकेच्या धोरणाचा स्थानिकांनी तीव्र शब्दात निषेध केला. आंदोलनामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या नगरसेविका खुर्शीदा मुल्ला यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या रस्त्याच्या विकासासाठी जिल्हा प्रभारी मंत्र्यांनी २५ लाख रुपये मंजूर केले आहेत. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पावसाळा संपल्यानंतर रस्ते विकासाचे काम झाले नाही. पावसाळ्यात रस्त्याचे डांबरीकरण अशक्य असून पेव्हर बसवून आपत्कालीन दुरुस्तीची कामे केली जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना हा रस्ता लवकर विकसित करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.