
बेळगाव : कविता करताना वाचन खूप आवश्यक आहे, वाचनातून आपल्याला शब्द भांडाराचे ज्ञान होते. आजूबाजूच्या जगातून अनुभवातून परिस्थितीतून कवितेचे विषय मिळतात, चार शब्द जोडून कविता तयार होत नाही तर ती परत परत वाचावी त्याचा अर्थ पहावा वास्तविक जगाकडे डोळसपणे पहावे, चांगल्या गोष्टींचे श्रवण करावे अनुभवातून खूप काही शिकता येते यासाठी लिखाणात सातत्य हवे, असे तारांगणच्या पाचव्या कवयीत्री संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून प्रा. स्वरूपा इनामदार बोलत होत्या.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीचे 5 वे कवयित्री संमेलन व हळदीकुंकू कार्यक्रम तारांगणने आयोजित केले होते. तारांगण व जीवन संघर्ष फाउंडेशन तसेच दिपा फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट यांच्या विद्यमाने गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी कवियत्री संमेलन व हळदीकुंकू समारंभ श्री सरस्वती वाचनालयचे डॉ.शकुंतला गिजरे सभागृह, शहापूर येथे पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात द्विपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, इंदिरा संत व महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिजामाता महिला सहकारी बँक अध्यक्षा लिला पाटील, उपाध्यक्षा सौ. भारती किल्लेकर, जीवन संघर्ष फौंडेशनचे संस्थापक गणपत पाटील, दिपा फॅशन इन्स्टिट्यूटच्या मोहिनी कुलकर्णी तसेच कवयित्री संमेलन अध्यक्षा म्हणून श्री सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार, तारांगण संचालिका अरुणा गोजे पाटील, माजी नगरसेविका सुधा भातखंडे व्यासपीठावर उपस्थित होत्या. लीला पाटील यांनी हळदीकुंकू व त्यामागील शास्त्रीय कारण महिलांना पटवून दिले. गणपत पाटील यांनी महिलांसाठी कार्यक्रमांसोबत समुपदेशनाची शिबिरे घेणे आवश्यक आहे यावर भाष्य केले.
या कार्यक्रमात जिजामाता महिला सहकारी बँक अध्यक्षा लिला पाटील, उपाध्यक्षा भारती किल्लेकर, डॉ. गणपत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कवयित्री संमेलनात जवळजवळ २० कवयित्री सहभागी होत्या. स्मिता किल्लेकर (स्नेहबंध), अस्मिता आळतेकर (तडजोडीचा झुला), स्मिता पाटील (अजूनही ती जगते आहे), डॉ. संजीवनी खंडागळे (आई), नेहा जोशी (माहेर), प्रतिभा सडेकर (पतिव्रता), गौरी धामणेकर (संक्रांत), सुवर्णा पाटील (जगणं हे अस असंच), प्रा.शुभदा प्रभू खानोलकर (आज गावची जात्रा), रम्यता किनी (कवितेतला उखाणा), मंजुषा पाटील (तारांगण), अपर्णा पाटील (नकळत भेटली), सुषमा जगजम्पि (माऊलीचे बोल), शारदा भेकणे (स्त्री जन्मा तुझी कहाणी), माया पाटील (आनंदोत्सव अभिजात मराठीचा), शितल पाटील (माहेर), प्रा. मनीषा नाडगौडा (ते अंगण हवं आहे मला), अरुणा पोतदार (हळदी कुंकू), वर्षा पाटील (ती), रोशनी हुंद्रे (चाळीशीची कहाणी) अशा एका पेक्षा एक दर्जेदार कवितांचा आस्वाद तारांगणच्या उपस्थित सभासद महिलांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रोशनी हुंद्रे यांनी उत्तमरीत्या पार पाडले. कार्यक्रमाचे आभार प्रा. मनीषा नाडगौडा यांनी केले.
यावेळी तारांगणच्या केंद्र संचालिका सुधा माणगावकर, नेत्रा मेनसे, अर्चना पाटील, सविता वेसने, स्मिता मेंडके, जयश्री दिवटे, अनुराधा मडीवाळ, जयश्री पाटील, गीता घाडी यासह अनेक तारांगण सदस्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी महिलांना वाण देऊन हळदीकुंकू समारंभ करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta