
बेळगाव : बेळगावहून कुंभमेळ्यासाठी निघताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बेळगावमधील चार जणांचे मृतदेह आज बेळगावात पोहचले. इंदोरच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात पोहोचलेले पार्थिव बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी आणि मृतांच्या कुटुंबियांनी स्वीकारले.
बेळगावहून सुमारे १८ जण कुंभमेळ्यासाठी रवाना झाले होते. ८ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यात कॅन्टर, टीटी आणि दुचाकी यांच्यात साखळी अपघात झाला होता. या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला तर १७ जण गंभीर जखमी झाले. या घटनेत बेळगावातील बसवनगल्ली येथील रहिवासी टी.टी. वाहन चालक सागर शाहपुरकर (५५), बेनकनहळ्ळी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या क्रांतीनगर येथील रहिवासी नीता बडमंजी (५०), छत्रपती शिवाजीनगर येथील संगीता मैत्री आणि वडगाव येथील ज्योती खांडेकर यांचा मृत्यू झाला होता. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी इंदोर जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जखमी आणि मृतांचे मृतदेह परत आणण्याची व्यवस्था केली. श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी बेळगावातील भुतरामनहट्टीजवळ मृतदेह स्वीकारले. त्यानंतर ते बेळगावातील होसूर बसवन गल्ली येथे पार्थिव पोहोचले. मध्यप्रदेशातील इंदोरचे उप-तहसीलदार आणि पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि टी.टी. चालक सागर शाहपुरकर (५५) यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. तसेच, वडगाव येथील ज्योती खांडेकर, बेनकनहळ्ळी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या क्रांतीनगर येथील रहिवासी नीता नीता बडमंजी आणि छत्रपती शिवाजीनगर येथील संगीता मैत्री यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले. त्यानंतर कुटुंबाने अंत्यसंस्काराचे विधी केले.

Belgaum Varta Belgaum Varta