
बेळगाव : सात दशकापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने 2004 रोजी सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनता मराठी भाषा आणि अस्मिता टिकविण्यासाठी गेली 68 वर्षे लढा देत आहे. लोकशाहीच्या मार्गाने चाललेला देशातील सगळ्यात मोठा लढा म्हणावा लागेल. आज देशाच्या राजधानीच्या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केंद्र शासनाने बेळगाव सीमा भाग तात्काळ महाराष्ट्रात सामील करावा असा ठराव मांडून सीमा भागातील मराठी भाषिकांना दिलासा द्यावा असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
दिनांक 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते खानापूर आणि बेळगाव येथून आज राजधानी दिल्ली येथे प्रयाण करत आहेत. सीमा प्रश्नाच्या ठरावासंदर्भात साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, संमेलनाचे मुख्य आयोजन सरहद्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांना देखील पत्राद्वारे सीमावासियांची मागणी कळविण्यात आली आहे. राजधानी दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत या संमेलनातून मराठी भाषा संस्कृती आणि सीमा लढ्याच्या चळवळीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी बेळगाव व खानापूर येथून दिल्ली येथे यामध्ये मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, खानापूर समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील, नेताजी जाधव, पांडू सावंत, राजाराम देसाई, मारुती मरगाणाचे, उमेश पाटील, बाबू कोले, सुनील आनंदाचे, सुहास हुद्दार, भीमसेन कलाप्पा करंबळकर, रवळू गोपाळ वड्डेबैलकर आदी रवाना झाले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta