
बेळगाव : आदर्श नगर येथे नुकताच महिला दिन गंगा नारायण हॉलमध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉ. वैशाली देशपांडे व मंडळाच्या अध्यक्षा सौ. नेहा जोशी तसेच कार्यकारी अध्यक्ष सौ. गीता गुरव व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी व समारंभाचे अध्यक्ष यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
मुख्य अतिथी डॉ. देशपांडे यानी आपल्या भाषणात महिला दिनाची पार्श्वभूमी, त्याची सुरूवात व महत्व या गोष्टी सविस्तर मांडल्या. आजची महिला घरा बरोबर व्यवसाय करते, त्यामुळे तिची जबाबदारी आणखीन वाढली आहे, तेव्हा महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. याकरिता त्यानी आहार, योग्य व्यायाम व आपली जीवनशैली यावर छानसे मार्गदर्शन केले. आपल्या दिनचर्येत योग तसेच कॅल्शियम युक्त आहार समतोल प्रोटिन्स अश्या आरोग्यपूर्ण टीप्स दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. नेहा जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, महिला पूर्वापार कुटुंबाचे व्यवस्थापन, मुलांचे घडण, कुटुंबाचे घडण पर्यायाने सामाजिक घडण ही त्रिसूत्री महिला सक्षमपणे पार पाडित असतात. आजची महिला घरीदारी सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे, या तिच्या भरारीमुळे ती महिला दिनाची मानकरी आहेच. सौ.जोशी यानी स्वरचित महिला दिनावर खूपच सुंदर कविता सादर केली.
कार्यक्रमाचे प्रारंभी ईशस्तवन सौ. सुनिता घाडी व भावना घाडी यानी गायले. सर्वाचे स्वागत सौ. घोरपडे यांनी केले. मुख्य अतिथींचा परिचय सौ. वर्षा घाडी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्याणी सुळेभावी यांनी केले. कार्यक्रमास आदर्शनगरातील अनेक महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta