बेळगाव : येथील न्यू गांधीनगर आणि अमन नगर भागातील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाला “भीम आर्मी भारत एकता मिशन”च्या नेतृत्वाखाली येथील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. उड्डाणपूल झाल्यास न्यू गांधीनगर तसेच अमन नगर परिसरातील शेकडो कुटुंबीयांना आपली घरे गमवावी लागतील अशी भीती व्यक्त करत तात्काळ सदर उड्डाणपूल प्रकल्प रद्द करण्याची मागणी येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली.
न्यू गांधीनगर व अमन नगर येथील नागरिकांनी शनिवारी चन्नम्मा सर्कल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना त्या संदर्भात निवेदन देण्यात आले. शहरात विकासाच्या नावाखाली गरीब जनतेला बेघर करू नये अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यावेळी बोलताना भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष मुन्नावर हुसेन म्हणाले की, शहरात विकास कामांच्या नावाखाली गोरगरीब जनतेचे नाहक हाल केले जात आहे. विकास कामाच्या नावाखाली गोरगरीब जनतेला बेघर केले जात असेल तर आम्ही या प्रस्तावित उड्डाणपुलाला तीव्र विरोध करत आहोत. भागातील गरीब जनतेला बेघर करून उड्डाणपुलाचे काम सुरू केले तर आम्ही तीव्र आंदोलन करून व हे काम थांबवू असा सज्जड इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी भीम आर्मी भारत एकता मिशनचे पदाधिकारी त्याचप्रमाणे न्यू गांधीनगर व अमन नगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

Belgaum Varta Belgaum Varta