

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेतर्फे 2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने महाराष्ट्र-कर्नाटक तसेच भारतभरात यावर्षी अतिवृष्टीने थैमान घातले असून अनेक शेतकऱ्यांची शेते, घरे पाण्याखाली बुडाली आहेत. यामध्ये प्रचंड असे नुकसान झाले आहे. या भीषण पुरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी आजच्या म.गांधी जयंती दिनाच्या औचित्याने मराठी विद्यानिकेतन शाळेतर्फे मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः शाळेमध्ये लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन शाळेच्या शिक्षिका वरदा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी दोन्ही महात्म्यांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यानंतर मराठी विद्यानिकेतन ते आरगन तलाव येथील गांधी चौकापर्यंत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन मानवतेची मानवी साखळी तयार करण्यात आली व पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. गांधी चौकातील म.गांधीच्या पुतळ्याला शाळेचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन.सी. उडकेकर, बी. जी. पाटील, शिक्षण संयोजक, नीला आपटे, समन्वयक सविता पवार, गौरी चौगुले, बालमंदिर प्रमुख सीमा कंग्राळकर, शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतर्फे सर्व विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, हितचिंतकांना पूरग्रस्तांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे. ही मदत मराठी विद्यानिकेतन येथे स्वीकारण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta