
बेळगाव : कणेरी मठाच्या मठाधीशांनी बबलेश्वर येथे आयोजित केलेल्या बसव शरणांच्या मेळाव्यात शिवशरण हरळय्या यांच्या जातीबाबत अपमानजनक वक्तव्य केले आहे. शिवशरण हरळय्या हे एक महान व्यक्तिमत्त्व होते. १२ व्या शतकातील क्रांतीमध्ये शिवशरण हरळय्या यांनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांनी आपल्या मांडीच्या त्वचेपासून पादत्राणे बनविली. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा कणेरी मठाधीशांनी अपमान करून लाखो समगार समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे राज्य सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समाजबांधवांच्यावतीने करण्यात आली.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, शिवशरण हरळय्यांचा जन्म विजापूर जिल्ह्यात तर कर्मभूमी बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण आहे. शिवशरण हरळय्या हे समगार समुदायाला पुढे घेऊन गेल्याचे अनेक संशोधक व लेखकांनी आपल्या पुस्तकांमध्ये नमूद केले आहे. राज्य सरकारकडून समगार हरळय्या दिन साजरा केला जातो. मात्र कणेरी मठाच्या मठाधीशांनी हरळय्या हे मूळचे तामिळनाडूचे असून त्यांचे नाव मादर चन्नय्या असा वारंवार उल्लेख केला. यामुळे त्यांचा अपमान झाला असून समाजबांधवांच्या भावनाही दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta