बेळगाव : ओरिसातील कटक येथे होणाऱ्या ‘बामसेफ’ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी ऐनवेळी रद्द केल्याच्या निषेधार्थ, संघटनेने देशभरात टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारले आहे.
ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी आणि अधिवेशनाला घातलेली बंदी मागे घ्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. देशातील ७२५ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात येत असून, ओबीसींच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे संघटनेने म्हटले आहे. ओरिसा सरकारने राजकीय दबावाखाली येऊन अधिवेशन रोखले असून, हा संविधानाच्या कलम १४, १९ आणि २१ चा भंग असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
आगामी आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना संघटनेने सांगितले की, १५ जानेवारी रोजी सर्व जिल्हा केंद्रांवर निदर्शने केली जातील. त्यानंतर २२ जानेवारी रोजी भव्य रॅली काढण्यात येईल, तर २२ फेब्रुवारी रोजी नागपुरातील आरएसएस मुख्यालयासमोर ‘महारॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ओरिसा सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि संघटनेचे झालेले आर्थिक नुकसान भरून द्यावे, अशी मागणी विरूपाक्षी मैत्री यांनी यावेळी केली. या प्रसंगी भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta