बेळगाव : दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील ‘टर्निंग पॉईंट’ असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा, परीक्षेच्या काळात काय काळजी घ्यावी आणि परीक्षेला कसे सामोरे जावे, यासाठी गेल्यावर्षीपासून खास दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालगोपाळ’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे .
या व्याख्यानमालेत जिल्ह्य़ातील प्रत्येक विषयाच्या तज्ञ शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले असून ही व्याख्यानमाला पिरनवाडी येथील कर्मवीर विद्यामंदिर येथे दि. 11 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता उद्घाटन होऊन मराठी विषयाचे पहिले पुष्प शिवाजी हसनेकर हे गुंफणार आहेत. व्याख्यानमाला 11 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक रविवार सकाळी 9.30 ते 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या व्याख्यान मालेत पिरनवाडी, मच्छे, खादरवाडी, वाघवडे, संतिबस्तवाड, रणकुंडये, किणये आणि कर्ले येथील विविध शाळांचे दहावीचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी या व्याख्यान मालेचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. गोपाळराव पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta