
बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविका निलिमा पावशे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नीलिमा पावशे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदनही मंत्री गडकरी यांना सादर केले. बेळगाव, महाराष्ट्र व आसपासच्या तालुक्यातील नागरिक गोव्यातील नव्याने उद्घाटन झालेल्या मोपा विमानतळ, सिंधुदुर्गातील चिपरी विमानतळ, रेडी बंदरा पर्यंत जाण्यासाठी प्रामुख्याने बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याचा वापर करतात. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि गोवा येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक या मार्गावरून होत असल्याने रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते.
हा रस्ता कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. जर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित करण्यात आला तर बेळगाव परिसरातील कृषीमाल, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुलभ होईल. तसेच गोव्यातील सिमेंट व स्टील, गोवा व सिंधुदुर्ग मधील मासे आणि कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याची वाहतूक जलद आणि सुरक्षित होऊ शकेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी वसुंधराराजे भोसले, शैलजा खानविलकर, उज्वला कदम पाटील, आमदार आशिष देशमुख आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta