
अथणी : बदलत्या काळानुसार समाजात लग्नाच्या पद्धती देखील बदलत चालल्या आहेत. आज-काल सिनेसृष्टीत दाखवल्याप्रमाणे लग्न समारंभ करण्याचा ट्रेंड आलेला असताना अथणी येथील एका नवविवाहित जोडप्याने लग्नाच्या दिवशी चक्क अवयव दान करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या लग्नाच्या दिवशी अवयव दान करत अवयव दानाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचे काम या नवदाम्पत्याने केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरातील सिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात अथणी तालुक्यातील कोकाटनूर येथील युवक वागेश काडदेवरमठ आणि कोमल हिरेमठ यांचा विवाह सोहळा बुधवारी विधिवत पार पडला. या विवाह सोहळ्याप्रसंगी नव दाम्पत्य वागेश आणि कोमल या नवविवाहितांनी आपले मरणोत्तर अवयव दान केले. यावेळी त्यांनी पर्यावरण संरक्षण, सेंद्रिय शेती आणि स्वदेशी साहित्याचा वापर यांना आपण प्राधान्य दिले पाहिजे असे विचार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. या नवदाम्पत्याने पारंपारिक विधीपूर्वक लग्न करत आपली संस्कृती जपत अवयवादानासारखा समाजाभिमुख निर्णय घेत समाजासमोर एक नवीन आदर्श घालून दिला आहे त्यामुळे हे लग्न एक खास लग्न म्हणून अथणीसह परिसरात चर्चेत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta