
बेळगाव : हिरवे हिरवे गार गालिचे, हरीत तृणांच्या मखमालीचे, आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे, गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी अशा बहारदार कवितानी काव्यसंध्या रंगली. लोकमान्य ग्रंथालय प्रणित बुक लव्हर्स क्लबच्या साप्ताहिक कार्यक्रमात सौ.सुनीता पाटणकर व डॉ. रश्मी फडके यानी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितांवर आधारित सुरेख कार्यक्रम सादर केला.
प्रारंभी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजाना अभिवादन करण्यात आले. सौ.आश्विनी वैद्य यानी प्रास्ताविक, स्वागत आणि परीचय करुन दिला.
सौ.सुनीता पाटणकर व डॉ. रश्मी फडके या दोघीनी बालकवींच्या निवडक कविता सादर केल्या. त्या म्हणाल्या की, बालकवी यांनी त्यांच्या अठ्ठावीस वर्षांच्या अल्प आयुष्यात अनेक कविता लिहिल्या.आयुष्य लहान पण कार्य महान. त्यातून त्यांचं शब्दावरचं, निसर्गावरचं, लहान मुलांवरचं प्रेम दिसतं. वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांचा अपघाती मृत्यु आला. एव्हढ्याशा आयुष्यात बालकवीनी केलेल्या रचना म्हणजे वात्सल्य, प्रेम याचा स्रोत होता. जगाला संदेश त्यानी दिला नाही. औदुंबर सारख्या रचनातून आध्यात्मिक स्पर्श दिसतो. रेव्हरंड टिळकानी त्यांचे भरभरून कौतुक केले. बालकवीना त्यांचा सहवासही लाभला. दोन्ही वक्त्यानी संध्या रजनी, फुलराणी, तारकांचे गाणे या व अन्य कविता सस्वर सादर करीत श्रोत्यांची दाद मिळवली. बालकवीना ईश्वराकडून मिळालेली संपत्ती होती असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta