
खानापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रदेश काँग्रेसने राज्यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी कंबर कसलेली दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक जागेची योग्य ती आखणी करून उमेदवार निश्चित केला आहे. जेणेकरून जास्तीत जास्त जागा जिंकता येतील. कर्नाटकात विशेषतः लिंगायत आणि वक्कलिंग समाजाच्या नेत्यांना प्रतिनिधित्व मिळत आले आहे. दक्षिण कर्नाटकात वक्कलिंग समाजाचा मोठा वाटा आहे आणि उत्तर कर्नाटकात लिंगायत. या दोन प्रमुख जातीय समीकरणात कर्नाटकचे राजकारण आजवर चालत आले आहे. बाकी इतर ठिकाणी मागास आणि मुस्लिम समाजाला काही ठिकाणी प्राधान्य देण्यात येते. पण लोकसभेच्या अनुषंगाने पाहायला गेले तर काही अपवाद वगळता फारस कुणाला प्रतिनिधित्व कर्नाटकात मिळाल्याचे दिसत नाही. पण यंदा काँग्रेसने अगदी ग्रास रुट पातळीवर जाऊन कोणती जागा कशी जिंकता येईल याचा अभ्यास केलेला दिसतो याचे उदाहरण म्हणजे कारवार लोकसभा मतदारसंघ.
उत्तर कर्नाटकात भलेही लिंगायत लोकांना प्रतिनिधित्व मिळत असले तरी कारवार लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जुन्या मुंबई प्रांताचा भाग असणाऱ्या कारवार जिल्ह्यात कोंकणी, मराठी समाज जो जातीने बहुतांश मराठा आहे जो या ठिकाणी मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे मागच्या चार निवडणुकीत सातत्याने हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहिला आहे. पण भाजप खासदाराच्या दुर्लक्षित वृत्तीला तसेच बेताल वक्तवाला कंटाळून लोकांनी यावेळी काँग्रेसला संधी देण्याचे ठरविलेले दिसते. त्यामुळे सदर जागा जिंकण्यासाठी कोणतीही कसर न सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे आणि म्हणूनच पारंपरिक राजकारणातून बाहेर पडत काँग्रेसने कारवार लोकसभा मतदारसंघासाठी मराठा समाजातील डॉ. अंजली निंबाळकर यांचा चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे कारवार मतदारसंघाला मार्गारेट अल्वा नंतर दुसऱ्यांदा महिला उमेदवाराला निवडून देण्याची संधी कारवार मतदारसंघातील मराठा समाजाकडे चालून आली आहे. त्यात अनेक वर्षानंतर मराठा उमेदवाराला संधी दिल्याने नवचैतन्य निर्माण झाले आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. घाटमाथ्यावरून ते किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या या मतदार लसंघात जवळपास 90% सुशिक्षित लोक आहेत. त्यामुळे डॉक्टर असणाऱ्या अंजलीताई निंबाळकर या कारवार लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य मानल्या जात आहेत. सोबत कर्नाटक राज्यातील मराठा समाजाला लोकसभेत प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी मराठा समाजाने देखील एकवटण्याचे आवाहन केले जात आहे. आज इतर राजकीय पक्षात भलेही मराठा समाजातील लोक विविध पदांवर कार्यरत असली तरी म्हणावे तसे योग्य स्थान त्यांना दिले जात नाही. पण काँग्रेसने या सगळ्याचा सारासार विचार करून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना संधी दिली आहे. त्या संधीचे सोने करण्याची जबाबदारी ही आता मराठा समाजावर आलेली आहे. देशातील सध्याच्या वातावरणात एकीकडे लोकशाही संपवली जात असताना महिला सबलीकरणाच्या नावाखाली महिलांना डावलले जात आहे पण काँग्रेसने महिलांना संधी देत डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या रूपाने देशहिताच्या दृष्टीने आणि महिला सबलीकरणाच्या दृष्टीने योग्य उमेदवार दिला आहे. याला न्याय देण्याचे काम आता जनतेने केले पाहिजे. जेणे करून येणाऱ्या काळात अनेक महिला तसेच मराठा समाजातील लोक समाजहिताच्या राजकारणासाठी पुढे येतील. अन्यथा पुन्हा कोण असे धाडस करणार नाही. एकीकडे मराठा समाज “एक मराठा लाख मराठा” या युक्तीने एकवटत आहे तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने कारवार लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजाने राजकीय आणि वयक्तिक हेवेदावे विसरून एकवटणे गरजेचे आहे आणि डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देणे गरजेचे असल्याचे आता जनसामन्यातून व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta