खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय व ताराराणी हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. २६ जानेवारी हा दिवस भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून वाटचाल सुरू केल्याची साक्ष देणारा असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले.
राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री परशराम आण्णा गुरव यांच्या शुभहस्ते पार पडले. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख उपस्थिती म्हणून हितचिंतक श्री. परशुराम कोलेकर (डायरेक्टर – Stellantis Motors, मलेशिया) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहुल जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संविधानकर्त्यांच्या विचारांवर उभ्या असलेल्या भारताची आठवण करून देणारा हा क्षण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
प्रमुख पाहुणे श्री. परशुराम कोलेकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना टी. एन. शेषन यांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे देऊन विद्यार्थिनींना प्रामाणिकपणा, शिस्त व ध्येयवाद यांचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. संविधानाने दिलेल्या अधिकारांइतकेच कर्तव्य महत्त्वाचे असून राष्ट्र उभारणी ही प्रत्येक नागरिकाच्या प्रामाणिक योगदानातूनच घडते, हे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व राष्ट्रसेवेची जाणीव दृढ झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राहुल जाधव यांनी देशसेवा ही केवळ मोठ्या कार्यातूनच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या जबाबदाऱ्यांतूनही घडते, हे सांगत उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. जबाबदार नागरिक घडविणे हेच प्रजासत्ताक दिनाचे खरे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्याला व्यासपीठावर निवृत्त शिक्षक श्री. संजीव वाटूपकर, ज्येष्ठ प्राध्यापक श्री. एन. ए. पाटील व ज्येष्ठ शिक्षक श्री. पी. एल. तरळे यांची मान्यवर उपस्थिती लाभली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माध्यमिक विभागाच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती अश्विनी पाटील यांनी जोशपूर्ण प्रजासत्ताक दिनाच्या घोषणांनी वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. समीक्षा झुंजवाडकर, कु. सबिना लोबो, कु. जी. एस. लक्ष्मी गोरल, कु. राजश्री राठोडकर, कु. लुसियाना लोबो, कु. सृष्टी धबाले व कु. अमुल्या बाळेकुंद्री यांनी अतिशय आत्मविश्वासाने, शिस्तबद्ध व प्रभावीपणे केले. प्रत्येक शब्दातून संविधानाबद्दलचा आदर व देशप्रेम प्रकर्षाने जाणवत होते.
इतक्या भव्य व शिस्तबद्ध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना या विद्यार्थिनींनी प्रत्येक ओळीतून देशप्रेम, कर्तव्यभावना व राष्ट्रनिष्ठा व्यक्त करून सर्वांची मने जिंकली. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे, वक्तृत्वशैलीमुळे व नियोजनबद्ध सहभागामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. श्री. टी. आर. जाधव तसेच प्रा. श्रीमती व्ही. एम. गावडे, सहशिक्षिका श्रीमती एस. सी. कणबरकर, श्रीमती एम. वाय. देसाई, श्रीमती जे. एफ. शिवठणकर तसेच प्रा. श्री. आर. व्ही. मरित्तमन्नावर, प्रा. श्री पी. व्ही. कर्लेकर, प्रा. श्री. नितीन देसाई व श्रीमती सीमा सावंत यांनी आपले मोलाचे योगदान दिले.
हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा म्हणजे संविधानावरील निष्ठा, देशप्रेम, शिस्त आणि नव्या पिढीच्या आशावादी स्वप्नांचा उत्सव ठरला.
Belgaum Varta Belgaum Varta