
खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य परिसरातील कोंगळा गावात गुरुवारी (ता.५) हत्तीने शेतात घुसून केळी तसेच उन्हाळी वायंगणी भात पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केल्याची घटना घडली. या घटनेत शेतकरी जयवंत गावकर यांच्या शेतातील पिकांचे सुमारे ५० हजार रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जंगलातून आलेला एक हत्ती कोंगळा गावाजवळील शेतीत शिरला. त्याने केळीच्या अनेक झाडांची मोडतोड केली. तसेच शेतातील उन्हाळी वायंगणी भात पिकावरून फिरत मोठ्या प्रमाणावर तुडवून नुकसान केले. सकाळी शेतात गेल्यानंतर शेतकरी जयवंत गावकर यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तात्काळ भीमगड वन विभागाला याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे बीटगार्ड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून पंचनामा केला असून नुकसानीचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
सध्या उन्हाळी हंगाम सुरू असतानाही भातासह इतर पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत मिळणारी भरपाई अत्यंत कमी असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसान भरपाई मिळविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे वन विभागाने हत्तींसह इतर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात तसेच झालेल्या नुकसानीची तात्काळ व योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta