खानापूर : गणेबैल टोल नाक्यावरील टोल चालकांना हटवून त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आले आहे. एनएचएआयने टोल कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे बंधनकारक होते मात्र टोल चालकाने स्वतःची मनमानी करत एनएचएआयचे सर्व नियम धाब्यावर बसवत येथील कर्मचाऱ्यांना किमान वेतनापासून वंचित ठेवत अत्यल्प वेतन दिले असून यामध्ये टोल कॉन्ट्रॅक्टरवर भ्रष्टाचार केल्याचा संशय निर्माण होत आहे.
मागील दोन अडीच वर्षांपासून टोल कर्मचारी अत्यल्प वेतनावर काम करीत आहेत. एनएचएआयला याबाबत माहिती देण्यात आली होती. टोल कर्मचाऱ्यांनी आपल्याला किमान वेतन मिळत नाही ही बाब एनएचएआयच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु ही समस्या सोडविण्यात एनएचएआय पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्या समस्येवर कोणतीही ठोस आणि प्रभावी उपाययोजना केली नाही त्यामुळे टोल कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. कालपासून एनएचएआयने अशोका कंपनीच्या सहकार्याने गणेबैल टोल नाका तात्पुरता सुरू केला आहे. सध्या टोल वसुली चालू आहे परंतु पुढील काळात नवीन टेंडर काढण्यात येईल आणि नवीन टोल ऑपरेटर नेमला जाईल परंतु तोपर्यंत सध्याचे टोल कर्मचाऱ्यांना बेरोजगार राहावे लागणार आहे. हा या कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गणेबैल टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्यात यावा अन्यथा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta