खानापूर : 27 जून रोजी होणाऱ्या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने चन्नेवाडी याठिकाणी पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली व गावच्या कुलदेव मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्ष निवृत्त शिक्षक प्रकाश पाटील हे होते. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून मोर्चाबद्दल माहिती देऊन सीमाभागातील कर्नाटक व्याप्त भूभागाच्या सातबारा उताऱ्यावर मराठी माणसाचे नाव आहे व ते कायम राहण्यासाठी मराठी माणसाने अशा आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून न्यायाचा निवाडा आपल्या बाजूने लागेल तोपर्यंत अशाच पद्धतीने लढणे गरजेचे आहे, असे सांगून मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी निरंजन सरदेसाई, पांडुरंग सावंत यांनी या सीमा आंदोलनाची माहिती देऊन गावोगावी मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्यामुळे हा मोर्चा यशस्वी होईल तरी युवकांनी सीमाप्रश्नी लढत राहण्याची विनंती केली. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई म्हणाले, समितीच्या अस्तित्वावरच राष्ट्रीय पक्षात असलेल्या मराठी भाषिकांची किंमत अवलंबून आहे तरी राष्ट्रीय पक्षात असलेल्या मराठी भाषिकांनी सुद्धा मराठी भाषा वाचवण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी सुहास पाटील यांनी या मोर्चाला पाठिंबा व्यक्त करून समितीच्या इतिहासामध्ये आपल्या वडिलांनी समितीचे नेतृत्व केले याच्या काही आठवणी सांगितल्या. अध्यक्ष निवृत्त शिक्षक प्रकाश पाटील सेवेत असताना मराठी भाषिक असल्यामुळे आलेल्या अडचणींचा पाढा वाचून सरकारची प्राथमिक शाळेबद्दल असणारी उदासीनता स्पष्ट केली व या मोर्चाला बहुसंख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करूया असे सांगून पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी निवृत्त शिक्षक विठ्ठल पाटील, रावजी नागोजी पाटील, दिलीप पाटील, सुधाकर पाटील, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विशाल पाटील, स्वागत पाटील, महादेव राठोडकर, ईश्वर पाटील, जीवन पाटील, सुधीर पाटील, सागर पाटील, ओंकार पाटील, कार्तिक पाटील, महेश पाटील, धीरज पाटील, अंकुर पाटील आदी युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta