खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लोंढ्याजवळ असलेल्या सातनाळी, माचाळी गावाला पांढऱ्या नदीच्या पुलाचा धोका दरवर्षी भेडसावितो. नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने पांढऱ्या नदीला पुर आला. आणि सातनाळी, माचाळी गावाला जोडलेल्या पुलावर चार फुट पाणी येऊन गावचा संपर्क तुटला. सातत्याने असे प्रसंग सातनाळी, माचाळी गावच्या नागरिकांना सतावत असतात.
याकडे संबंधित तालुक्याच्या आमदाराचे, खासदाराचे, तसेच जिल्हा पंचायत, तालुका पंचायत लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पावसाळा आला सातनाळी, माचाळी गावच्या नागरिकांना मोठे संकट येते. संपर्क तुटतो. परिणामी मुलाना शाळेला जाण्यासाठी, नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्यात कित्येक दिवस गावातच थांबावे लागते. अशावेळी अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. गावात आजारी व्यक्ती असलीतर कोणतीच सोय होत नाही. त्यामुळे मृत्यूशी झुंज द्यावी लागते.
गेल्या कित्येक वर्षांपासून सातनाळी माचाळी गावच्या नागरिकांनी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींच्याकडे आपली गाऱ्हाणी सातत्याने मांडून आजतागायत कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांना गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात मरनयातना सोसाव्या लागतात.
तेव्हा खासदार, आमदार लोकप्रतिनिधींनी सातनाळी, माचाळी गावच्या रस्त्यावरील नदीपुलाची व्यवस्था करावी, अशी मागणी या गावच्या नागरिकांतून होत आहे.