कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्हा राहिला आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेकडून शिवबंधन नाकारल्यानंतर संजय पवारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली, तर भाजपनेही राजकीय खेळी करताना धनंजय महाडिक यांना उमेदवारी देत निवडणुकीतील चुरस वाढवली. सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात थेट लढत होणार आहे.
त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रॉस व्होटिंगच्या भीतीने सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना सेफ झोनमध्ये ठेवण्यास प्राधान्य दिले आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक (भाजप), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत आणि संजय पवार (शिवसेना) आणि इम्रान प्रतापगढी (काँग्रेस) हे उमेदवार सहा जागांसाठी रिंगणात आहेत.
कोल्हापुरात राजकीय उत्सुकता शिगेला
संभाजीराजेंनी शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्या विजयासाठी शिवेसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ संजय पवार शिवसेनेमध्ये सक्रीय आहेत. दुसरीकडे भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवत कोल्हापूरच्या दोन मल्लांमध्ये कुस्ती लावून दिली आहे. जिल्ह्यात महाडिक गटाला विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे महाडिक यांनीही विजयासाठी गेल्या काही दिवसांपासून पायाला भिंगरी लावली होती. त्यांचे कट्टर राजकीय विरोधक पालकमंत्री सतेज पाटील यांनीही महाडिकांना रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे विजयी गुलाल कोण उधळणार याचे उत्तर आज संध्याकाळी साडे सातपर्यंत मिळेल. मात्र, कुस्ती कोण मारणार? याची उत्सुकता कोल्हापुरात शिगेला पोहोचली आहे.
Check Also
राजकोट येथील शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात
Spread the love कोल्हापूर : सिंधुदुर्गमधील पुतळ्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात …