Wednesday , March 4 2026
Breaking News

महाराष्ट्र -कर्नाटक वादाचे लोकसभेत पडसाद; सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत आक्रमक

Spread the love

 

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सुरू असलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला. कर्नाटक सरकारवर टीका केल्यानंतर लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली.

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत म्हटले की, मागील 10 दिवसांपासून महाराष्ट्रात वेगळा मुद्दा चर्चेला येत आहे. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून बेताल वक्तव्य करण्यात येत आहे. महाराष्ट्रच्या नागरिकांना बेळगावच्या सीमेवर मारहाण करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या नागरिकांना झालेल्या मारहाण सहन करणार नाही. मागील 10 दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात कट रचला जात आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली जात आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अत्याचार, दडपशाही सुरू असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले. एका राज्याच्या मंत्र्यांना प्रवेश करण्यास मनाई केली जाते. अशी बंदी घालणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या अत्याचाराचा धिक्कार करत असल्याचे राऊत यांनी म्हटले. विनायक राऊत यांनी लोकसभेत हा मुद्दा मराठीत उपस्थित केला. महाराष्ट्राच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभेत गदारोळ झाला.

महाराष्ट्राच्या खासदारांकडून कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला जात असताना कर्नाटकच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला. महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या विरोधक अडचणीत आल्यावर हा मुद्दा उचलला जात असल्याचा दावा कर्नाटकच्या खासदारांनी केला. महाराष्ट्र-कर्नाटकत सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने संसदेच्या कामकाजातून काढण्याचे आदेश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले.

दरम्यान, ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सीमावादा प्रकरणी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. तर, खासदार अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांनी संसदेच्या प्रागंणातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली.

संजय राऊत यांची टीका
बेळगावसह सीमाभाग केंद्रशासीत प्रदेश करा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा आरोप राऊत यांनी केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपवण्याचा खेळ सुरू झाला आहे. बेळगावातील हल्ले हा त्याच कटाचा भाग असल्याची घणाघाती टीका राऊत यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *