
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे गेली 11 दिवस न्यायालयीन कोठडीत असणार्या राणा दाम्पत्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणार्या राणा दाम्पत्यांना खार पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांना वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असणार्या राणा दाम्पत्यांच्या जामीन याचिकेवर शनिवारी (दि.30) सुनावणी पार पडली होती. यावेळी सरकारी वकीलांचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने निर्णय सोमवारपर्यंत (दि.2) राखून ठेवला होता. सोमवारी जामीनवरील युक्तीवाद पूर्ण झाला होता. आज सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला.
मुंबई उच्च न्यायालयाने 25 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीवेळी, राणा दाम्पत्याची चांगलीच कानउघडणी केली होती. गुन्हा रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावला होता. विशेष सरकारी वकिलांच्या दाव्यात तथ्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.
मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर 124 अ आणि 353 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची चांगलीच हजेरी घेत फटकारले होते. दरम्यान, जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगात, तर रवी राणा यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती.
Belgaum Varta Belgaum Varta