नवी दिल्ली : तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गंभीर आरोप केला आहे. नायडू यांचे कट्टर विरोधक आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा, असा अतिशय धक्कादायक आरोप नायडू यांनी केला आहे. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण तिरुमला तिरुपती देवस्थानाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि चंद्राबाबू नायडू यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या वतीने भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नायडूंच्या या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.
वायएसआर काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. शुद्ध तुपाऐवजी त्यांनी प्राण्यांची चरबी वापरली. मात्र, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात असल्याचेही चंद्राबाबूंनी स्पष्ट केले आहे. मंदिरातील सर्व काही स्वच्छ करण्यात आले आहे. यामुळे गुणवत्ता सुधारली आहे, असे देखील चंद्राबाबूंनी स्पष्ट केले.
तिरुमला तिरुपती देवस्थानमद्वारे चालवल्या जाणाऱ्या तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात मागणीनुसार, प्रसादाचे लाडू दिले जातात. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना नायडू यांनी दावा केला की, प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाणारे तिरुमला प्रसादाचे लाडू निकृष्ट घटकांनी बनवले जातात.
वायएसआर काँग्रेसचा पलटवार
वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी नायडूंवर तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला हानी पोहोचवल्याचा आरोप केला. रेड्डी यांनी तेलुगू ऑन एक्समध्ये लिहिलं की, चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला गंभीर हानी पोहोचवली आहे. तिरुमला प्रसाद यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत दुर्दैवी आहेत. कोणीही असे शब्द बोलू नये किंवा आरोप करू नये.