आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात दुधातील भेसळीच्या एका भीषण घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. भेसळयुक्त दूध प्यायल्याने १६ जणांचा मृत्यू झाला असून, तीन जणांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडली आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच लालचेरुवू, चौडेश्वरनगर आणि स्वरूपनगरसारख्या भागांमध्ये लोक आजारी पडू लागले होते.
दूध प्यायल्यानंतर या गावातील लोकांना उलट्या, पोटदुखी, लघवी थांबणे आणि तीव्र किडनी निकामी होण्याचा त्रास होऊ लागला. सुरुवातीला २२ फेब्रुवारी रोजी काही प्रकरणे नोंदवली गेली. एका स्थानिक डेअरी युनिटने पुरवलेले दूध एथिलीन ग्लायकॉल नावाच्या विषारी पदार्थाने बनवण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
भेसळीमुळे लहान मुले आणि वृद्धांसह २० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेतील मृतांचा आकडा आता १६ वर पोहोचला असून, तीन रुग्ण आयसीयूमध्ये गंभीर अवस्थेत आहेत. गोदावरी जिल्ह्यातील नरसापूरम गावाताली डेअरीमधून हे दूध विकले जात होते. १०० पेक्षा जास्त कुटुंबांना या डेअरीमधून दूध देण्यात आले होते. दूध पिल्यानंतर काही तासांनीच लोकांची प्रकृती बिघडू लागली होती. त्यानंतर त्यांना डायलिसिस आणि व्हेंटिलेटरच्या आधाराची गरज भासली.
आरोग्य विभागाच्या तपासणीत याची पुष्टी झाली की, दुधात एथिलीन ग्लायकॉल मिसळले होते, ज्यामुळे मूत्रपिंड आणि इतर अवयवांना नुकसान होते. अनेक रुग्णांमध्ये रक्तातील युरिया आणि सीरम क्रिएटिनिनची पातळी वाढल्याचं आढळून आले. हा पदार्थ सामान्यतः अँटी-फ्रीझमध्ये वापरला जातो आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्यासाठी त्याचा वापर अत्यंत धोकादायक आहे.
Belgaum Varta Belgaum Varta