मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विविध प्रश्नावरून केंद्र सरकारवर टोला लगावला आहे. जम्मू काश्मिरमधील होत असलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. “आम्ही काश्मिरी पंडितांचे रक्षण करू असं म्हणत सत्तेवर आले आणि आता खुलेआम हत्या केल्या जात आहेत. ते पंडितांचे रक्षण करू शकत नाहीत.” असं म्हणत त्यांनी केंद्रावर टीका केली आहे.
देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेकडे आणि काश्मिरमधल्या प्रश्नाकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. भाजपा फक्त राजकारणात गुंतलं असून हे देशाचं दुर्दैव आहे असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान हार्दिक पटेल यांच्या भाजप प्रवेशावर ते म्हणाले की, देशद्रोही हा शब्द भाजपानेच हार्दिक पटेलसाठी वापरला होता. त्यांना असे लोकं सापडत असतात त्यामुळे मी यावर जास्त काही बोलणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
“काश्मिरी पंडित आज रस्त्यावर उतरले असून त्यांनी सामुदायिक स्थलांतर करण्याचा इशारा दिला आहे. पंडितांच्या घरवापसीचं आश्वासन देणारं सरकार पंडितांचं रक्षण करू शकत नाही, केंद्र सरकार निवडणुका आणि राजकारण यामध्ये गुंतलं आहे. हे पंडितांचं आणि देशाचं दुर्दैव आहे.” असं मत त्यांनी व्यक्त केलं. नोटबंदीनंतर काश्मीर मधील दहशतवाद संपेल असं आश्वासन देणारं सरकार राजकारणात गुंतून पडलं आहे. त्यामुळे सरकारला पंडितांचा आक्रोश दिसत नाही म्हणून केंद्र सरकार पंडितांचं रक्षण करू शकत नाही, असा टोला त्यांनी लावला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta